Skip to main content

केरळमधील आंब्यांचा गोडवा चाखा


पुणे - लालबाग, हापूस, तोतापुरी, बदाम, पायरी आणि नाटी या केरळमध्ये उत्पादीत होणाऱ्या आंब्यांचा गोडवा चाखण्याचा आनंद पुणेकरांना यंदा मिळणार आहे. यंदा या आंब्यांची आवक चांगली होत असून, भावही नियंत्रणात आहे. 

देशात आंब्यांचा सर्वात प्रथम हंगाम हा केरळमध्ये सुरू होतो. जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत येथील आंबा बाजारात येऊ लागतो. दरवर्षी हा आंबा मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर भारतात विक्रीला पाठविला जात असतो. त्या तुलनेत पुण्याच्या बाजारात याची थेट आवक कमी असते. मुंबई येथील घाऊक बाजारातून त्याची पुण्यात आवक होत असते. यावर्षी केरळमधील आंब्यांची थेट आवक सुरू झाली आहे. केरळमधील पलकड जिल्ह्यातून आंबा पुण्याच्या बाजारात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून याची आवक चांगली होत असून, प्रतिदिन सरासरी अकराशे ते बाराशे पेटी इतकी आवक होत आहे, अशी माहिती व्यापारी रोहन उसरळ यांनी दिली.
या आंब्याचा हंगाम साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरवातीपर्यंत चालतो. सध्या तेथील हंगाम जोरात सुरू आहे. यावर्षी उत्पादन चांगले असून, कमी पावसामुळे हंगाम थोडा उशिरा सुरू झाला आहे. पुण्याच्या बाजारातून उत्तर प्रदेशातील बाजारातही हा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. सुमारे 300 बॉक्‍स आंबा तेथे पाठविल्याचे उरसळ यांनी नमूद केले. लालबाग या आंब्याचा प्रति किलोचा भाव 50 ते 70 रुपये किलो, हापूस चा 150 ते 200 रुपये किलो, तोतापुरीचा 35 ते 45 रुपये, बदामचा 80 ते 100 रुपये, पायरीचा 80 ते 100 रुपये, नाटीचा 30 ते 40 रुपये किलो इतका आहे. या आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर कोकण आणि कर्नाटकातून हापूसची आवक सुरू होईल. सध्या कोकणातून तुरळक प्रमाणात आंब्याची आवक होत असली, तरी पेटीला पाच ते सात हजार रुपये इतका भाव आहे.
source

Comments